महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाणे आणि पडणारा पाऊस

मुंबई (बारामती झटका)
पश्चिम घाटातील महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा सातत्याने होणाऱ्या ‘वर्षा’वाने न्हाऊन निघाल्या आहेत. जुलै महिन्यात सलग तीन आठवडे पडणाऱ्या पावसाने आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा अधिक पटीने पावसाची नोंद झाली आहे. वर्षा उत्सवासाठी प्रसिद्ध ठिकाणच्या पावसाच्या नोंदीने तीन आठवड्यांतच तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. परिणामी, सर्व धरणे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील आठ अतिपावसासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांची आकडेवारी अचंबित करणारी आहे. महाबळेश्वरच्या पर्यटन शहराच्या परिसरात कृष्णा-कोयनेसह पाच नद्यांचा उगम होतो. या परिसरात आतापर्यंत तीन हजार ३७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना आणि नवजा येथे अनुक्रमे ३,२५५ आणि ३,७९४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. काल सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत महाबळेश्वरला २६७, कोयनानगरला १९८, तर नवजा येथे १७२ मिलिमीटर पाऊस झाला.
कोयना धरणात ७८ हजार ४८७ क्यूसेक पाणी येत आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या ‘वर्षा’वाने सर्वत्र जल्लोत्सव साजरा होत असल्यासारखे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा ३,६५५, राधानगरी येथे ३,१७७ तर आंबोलीला ३,२९७ मिलिमीटर पावसाने चांगलेच धुतले आहे.

सांगली जिल्ह्यात चांदोलीला २,२६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. चांदोली येथेच वारणा नदीवर धरण आहे. या धरणात २० दिवसांत २० टीएमसी पाणी जमा झाले आहे. या परिसरात आतापर्यंत ३ हजार ४११ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील निवळे येथे ३,१६४ विशाळगडाजवळील गजापूर येथे ३,६९७, गगनबावडा ३,२९३, कुंभी धरण क्षेत्रावर ३,१२१, राधानगरी तालुक्यातील हसने येथे २,९०५, वाकी येथे २,८९३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आंबोलीलाही ३,२९७ मिलीमीटर पावसाने धुतले आहे.
कोयनेत दररोज दोन टीएमसी पाणी
कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र महाबळेश्वर ते कोयनानगर. सह्याद्री पर्वतरांगेत दक्षिणोत्तर कोयना नदी सत्तर किलोमीटर वाहत येत होती. या पाणलोट क्षेत्राचा विस्तार मोठा असून, सर्वाधिक पाऊस कोसळतो. परिणामी, दररोज किमान एक ते पाच टीएमसी पाणी धरणात जमा होते. गेल्या २३ दिवसांत पंचेचाळीस टीएमसी पाणी आले आहे. यापैकी तीन दिवस दररोज पाच टीएमसी पाणी वाढले आहे.
पाथरपुंज धुवाधार
सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर पाटण तालुक्यात असलेल्या पाथरपुंज हे गाव प्रतिचेरापुंजीच आहे. २०१९ मध्ये पाथरपुंजला १० हजार २७१ मिलिमीटर पाऊस होऊन त्याने चेरापुंजीला मागे टाकले होते. चालूवर्षी आतापर्यंत ४,१०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.