पुढील पाच दिवस पावसाच्या सरी बरसणार कुठे?

मुंबई (बारामती झटका)
राज्यभरात मान्सूनने आता पूर्णपणे उघडीप घेतली असली तरी अवकाळी पावसाचा फेरा कायम राहणार आहे. पुढील पाच दिवस राज्यासह मुंबईत ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. मुंबई महानगर प्रदेशात शनिवारसह रविवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनने आता काढता पाय घेतल्यानंतर उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य मान्सूनचे आगमन दक्षिणेकडील राज्यात होते.
दक्षिणेकडील तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये हा पाऊस पडतो. या राज्यांपुरता हा मान्सून निगडित असला तरी त्याचा किंचित परिणाम म्हणून महाराष्ट्रातही पाऊस पडतो. ईशान्य मान्सून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान पडतो, असे हवामान अभ्यासक यांनी सांगितले.
हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात यापुढे तीन महिने होणाऱ्या पावसाला ईशान्य मान्सून किंवा हिवाळी पाऊस म्हणूनच संबोधले जाते.

कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून गुरुवारी झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल. तर मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता अधिक आहे.
१७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.