सदाशिवनगर हद्दीतील श्री महालक्ष्मी मंदिर (गाड्यावरची आई) या मंदिराची झालेली पडझड अत्यंत दुर्दैवी आहे ग्रामसभेत विषय घ्यावा – श्री. मदन सुळे पाटील.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांनी त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा ग्रामस्थ उग्र स्वरूप घेण्याच्या तयारीत….
सदाशिवनगर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर हद्दीतील श्री महालक्ष्मी मंदिर (गाड्यावरची आई) या मंदिराची झालेली पडझड अत्यंत दुर्दैवी असून सदरचा विषय येणाऱ्या ग्रामसभेत घ्यावा, असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवा नेते श्री. मदन अंकुश सुळे पाटील यांनी सदाशिवनगर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना पत्र वजा निवेदन दिलेले आहे.


सदरच्या निवेदनात, मौजे सदाशिवनगर येथील श्री महालक्ष्मी मंदिर (गाड्यावरची आई) खूप वर्षापासून अस्तित्वात असून ते सदाशिवनगर पुरंदावडे व मांडवे गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. सदरचे मंदिर मांडवे आणि सदाशिवनगर सीमेवर असल्यामुळे या मंदिरास विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. सदर मंदिराची गेल्या तीन ते चार वर्षापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. सदरच्या मंदिराकडे ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे श्री महालक्ष्मी भक्तामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. श्री महालक्ष्मी (गाड्यावरची आई) या मंदिराच्या झालेल्या पडझडीचे स्पष्टीकरण येणाऱ्या ग्रामसभेत देण्यात यावे व तातडीने संबंधित विभागास काम पूर्ण करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात. अन्यथा श्री महालक्ष्मी देवीचे (गाड्यावरची आई) भाविकभक्त ग्रामपंचायत कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनाद्वारे युवा नेते श्री. मदन अंकुशराव सुळे पाटील यांनी ग्रामपंचायत व सरपंच यांना दिलेले असून सदरची प्रत गटविकास अधिकारी व माळशिरस पोलीस स्टेशन येथे परत देण्यात आलेली आहे.
सदरच्या निवेदनाचे अवलोकन करता भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री महालक्ष्मी मंदिर (गाड्यावरची आई) हे जागृत देवस्थान आहे. सदरच्या देवस्थानाची दुरावस्था श्री संत पालखी महामार्गाचे विस्तारीकरण केल्यानंतर झालेली आहे. त्यामुळे सदरच्या महामार्गाचे ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांनी वेळीच लक्ष देऊन भाविकांच्या श्रद्धेचा आदर करावा. सदरच्या ठिकाणी पावसाचे अस्वच्छ व गढूळ पाणी मंदिरामध्ये जात आहे. त्यामुळे पावित्र्य राहत नाही. भाविकांना जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही. सदरच्या ठिकाणी गटारीचे अपूर्ण काम राहिलेले असल्याने दोन्ही बाजूकडून पाणी मंदिरामध्ये येत आहे. त्यामुळे भाविकांच्या मनामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे. तरी ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांनी त्वरित गटारीचे काम करून मंदिरांचे पावित्र्य राखावे, अशी भाविकांची मनोमन इच्छा आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.