साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रामधील ऊस शेतीमध्ये ‘एआय’चा वापर वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या नूतनीकृत पुतळ्याचे अनावरण
बारामती (बारामती झटका)
साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, रणजीत तावरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे आदी उपस्थित होते.

जनतेला गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला रयतेचे राज्य म्हणून ओळखले जात होते. त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शांचे स्मरण करून राज्यशासन काम करत आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या बाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे काम नेहमीच होणे गरजेचे असून माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 1984 साली उभारलेल्या या पुतळ्याचे नूतनीकरण करून घेतली आहे.
ते पुढे म्हणाले, या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकरी, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींना अधिकचे महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामांवर परिणाम होऊ न देता महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कृषी पंपांना वीजबील माफी, लाडकी बहीण योजनेला निधीची तरतूद आदींसाठी तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजाची सवलतीची सुमारे बाराशे कोटी रुपयांची रक्कम जिल्हा सहकारी बँकांना देण्यात आली असून त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरावे, असे आवाहनही त्यांनी केले. दुधाच्या अनुदानाची रक्कम दुग्ध संस्थांपर्यंत पोहोविण्यात येत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यावर्षी ऊस पीकासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे (एआय) आधुनिक तंत्रज्ञान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने आणले असून त्याचा ऊस उत्पादनवाढीसाठी तसेच पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी मोठा फायदा होणार आहे. हे पाहता या वर्षीच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली असून आवश्यकतेनुसार पुढील पुरवणी मागण्यांमध्ये अधिकची तरतूद करण्यात येईल. एआय तंत्रज्ञान सोयाबीन, कापूस, केळी, फळबागा आदींसाठीही वापरण्यात येईल, असेही म्हणाले.

लवकरच पुण्यात ॲग्री हॅकेथॉन भरविण्यात येणार असून त्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, नवोद्योग (स्टार्टअप्स), कृषी तज्ज्ञ, शेतकऱ्यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसंबंधी समस्या सोडविण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने राज्य शासन करणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, खर्च कसा कमी होईल यासाठी नवकल्पक संशोधकांना चालना मिळण्यासाठी या हॅकेथॉनचा उपयोग होणार असून येत्या जूनपर्यंत अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, हवामान अंदाज, स्वयंचलित सिंचन तंत्रज्ञान, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा योग्य वापर, कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर आदींवर संशोधन करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम बनविण्याचा मानस आहे.

राज्यशासन साखर कारखान्यांना आणि त्या माध्यमातून उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काम करत असून केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे मोलॅसिसवरील 28 टक्के उत्पादन व सेवा कर (जीएसटी) 5 टक्क्यावर आणला गेला आहे. राज्यशासनाच्या पाठपुराव्यामुळे कारखान्यांवर आकारण्यात आलेला सुमारे 20 वर्षापासूनचा आयकर केंद्र शासनाने माफ केल्यामुळे कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारखान्यांचे इथेनॉल, सहवीज निर्मिती प्रकल्पांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
माळेगाव कारखान्याने उच्च दराची परंपरा राखल्याबद्दल अभिनंदन करुन श्री. पवार पुढे म्हणाले. कारखान्याने 2022-23 मध्ये प्रतीक्विंटल 3 हजार 411 रुपये, 2023-24 च्या गळीत हंगामासाठी राज्यात विक्रमी 3 हजार 636 रुपये दर दिला आहे. माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अधिकचा ऊस उपलब्ध व्हावा यासाठी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या बंद पाईपलाईनच्या कामासाठी राज्यशासनाने 460 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कऱ्हा-नीरा उपसा सिंचन योजना उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास निधी देण्यात आला असून त्या कामाला सुरूवात झाली आहे. कारखान्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
साखर कारखान्यांनी कारखान्यातून निघणाऱ्या खराब रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीवेज ट्रीटमेंट प्लँट उभारावेत व ते पाणी आसपासच्या शेतीसाठी उपलब्ध करुन द्यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या. साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीच्या अनुषंगाने त्रिपक्षीय समितीला बैठकीबाबत सूचना देण्यात येतील, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात ॲड. केशवराव जगताप म्हणाले, यावर्षी ११ लाख २१ हजार मे. टन ऊस गाळप करुन ११ लाख १७ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले असून इथेनॉल तसेच सहवीज निर्मितीही चांगल्या प्रकारे केली आहे. चालू गळीत हंगामात ३ हजार १३२ रुपये दर दिला असून खोडकी आणि दिवाळीतही पुढील बिले देण्यात येतील. कारखान्याच्या सुमारे ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी एकरी १०० टनाच्या वर उत्पादन घेतले आहे असे त्यांनी सांगितले.

व्हाईस चेअरमन राजेंद्र ढवाण पाटील यांनी स्वागत केले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विश्वासराव आटोळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ॲड. रवींद्र माने, बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन संजय कोकरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सभासद शेतकरी, कामगार आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.