स्वच्छतेतून लोकसेवेचा संदेश; कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेचा स्तुत्य उपक्रम

बारामती (बारामती झटका)
आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना केवळ शब्दांनी नव्हे, तर कृतीतून अभिवादन करण्याच्या उद्देशाने कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संस्थेच्या विविध विभागांतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
मागील वर्षी आदरणीय अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त, त्यांचा वाढदिवस केवळ वर्षातून एकदाच साजरा न करता प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेला समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा संकल्प संस्थेने केला होता. त्यानुसार दादांनी उभारलेल्या विविध विकासकामांपैकी दर महिन्याला एका ठिकाणी स्वच्छता करून समाजात स्वच्छतेचा संदेश देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
या उपक्रमाची सुरुवात २२ जुलै २०२५ रोजी सुपा ग्रामीण रुग्णालय, सुपा येथून झाली होती. डिसेंबर २०२५ अखेर बारामती तालुक्यातील विविध ४२ ठिकाणी स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक स्वतः आदरणीय अजितदादा पवार यांनी डिसेंबर महिन्यात केले होते. मात्र २८ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या दुःखद निधनानंतर, यंदाची २२ जुलै ही तारीख जड अंतःकरणाने त्यांच्या जयंतीच्या रूपाने साजरी करण्याची वेळ आली.

दादांनी आयुष्यभर जोपासलेली लोकसेवा, शिस्त, वेळेचे नियोजन आणि स्वच्छतेची संस्कृती समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी कल्याणी कॉर्नर ते रसाळ कॉर्नर या परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविली. दादा रोज सकाळी ६ वाजता कामाची सुरुवात करत असत, त्याच कार्यशैलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व सहभागी सकाळी ६ वाजताच अभियानासाठी उपस्थित झाले. परिसरातील प्लास्टिक, कचरा व इतर टाकाऊ वस्तू गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
या उपक्रमातून स्वच्छता हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला. दादांच्या कार्याचा वारसा जपत समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनीसाहेब पवार, राज्यसभा खासदार व संस्थेचे विश्वस्त श्री. पार्थदादा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय दशरथदादा धुमाळ, सचिव प्रफुल्ल तावरे, खजिनदार सुभाष सोमाणी तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
याबाबत माहिती देताना संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री.विकास निर्मळ म्हणाले, “दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि कार्यपद्धती आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. स्वच्छतेतून समाजसेवा आणि समाजसेवेतून राष्ट्रसेवा हा त्यांचा संदेश कृतीतून जिवंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही मोहीम त्यांच्या पवित्र स्मृतींना वाहिलेली कृतीशील आदरांजली आहे.”

यावेळी संस्थेच्या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



