तेलंगणातील गोयेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा गौरव आमदार आयुष्यमती लक्ष्मी यांचे शुभहस्ते संपन्न.

आसिफाबाद (तेलंगणा) (बारामती झटका)
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळ आणि हुमन राईटस असोशिएशन ऑफ इंडिया, तेलंगाना तर्फे आयोजित सम्राट अशोक यांची 2330 वी जयंती व महात्मा फुले यांची 200 वी जयंती आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्ताने डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्यातील गोयेगाव येथे नुकतेच 29 एप्रिल 26 रोजी सायं. 5 वा. अत्यंत उत्साहात पार पडला. आसिफाबाद विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आयुष्यमती लक्ष्मी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पुतळ्याच्या अनावरणानंतर झालेल्या मुख्य सोहळ्यात आमदार महोदयांच्या हस्ते समाजसेवक आणि सत्यशोधक चळवळीचे काम पूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यात करणारे आणि महात्मा फुले साहित्य साधने चरित्र व प्रकाशन समिती , महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा महाकवी वामनदादा कर्डक राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2026 ने विशेष सत्कार आमदार आयुष्यमती लक्ष्मी यांच्या हस्ते मोमेंटो शाल, सन्मानपत्र देऊन करण्यात आला. तर ढोक यांनी सर्वाकडून भीम प्रतिज्ञा वदवून घेतली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक मधु बावलकर, तेलंगणा, माजी न्यायाधीश शिवदास महाजन, पुणे, जेष्ठ लेखक नागनाथ डोलारे, पनवेल, डॉ. दिलीप नेवसे, सातारा, एकपात्री कलाकार गायत्री रामटेके, चंद्रपूर, माजी पोलीस अधिकारी प्रदीप फुलझेले, नागपूर आणि प्रमुख वक्ते म्हणून मा. ॲड. डॉ. सत्यपाल कातकर, अभिवक्ता, उच्च न्यायालय, संविधान तज्ञ, राजुरा चे उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना आमदार लक्ष्मी म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचा पुतळा हे केवळ स्मारक नसून ते समता आणि न्यायाचे प्रतीक आहे. समाजातील साहित्यिक आणि विचारवंत बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत, ही आनंदाची बाब आहे.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. कातकर यांनी संविधान निर्मितीपासून संविधानामुळेच आपला देश उत्तमोत्तम चालतोय आणि प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा कोणताही भेदभाव न करता समान अधिकार दिल्याचे सांगून हे उपकार बाबासाहेबांचे आपण विसरता कामा नये, असे देखील म्हटले. शेवटी बुद्ध, अशोका, फुले, आंबेडकर फेस्टिवल गायनाच्या कार्यक्रमाला गोयेगाव आणि परिसरातील आंबेडकरी अनुयायांनी मोठा सहभाग नोंदविल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरारे तारू, ताकसांडे दत्तू, एम. शंकर, टी. आनंदराव यांनी केले होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



