माऊलींच्या वाखरी तळावर 337 वर्षापासून देहूकरांची कीर्तन सेवेचा ह.भ.प. बापूसाहेब देहुकर महाराज मळोलीकर यांना बहुमान
पंढरपूर ( बारामती झटका )
वाखरी ता. पंढरपूर या ठिकाणी कैवल्य साम्राज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासमोर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज मळोली ता. माळशिरस येथील रहिवासी असणारे ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.
जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांच्यापासून या ठिकाणी सेवा करण्याचा मान देहूकरांना असून गेली अनेक वर्षापासून ही सेवा देहू संस्थानचे माजी अध्यक्ष व जेष्ठ किर्तनकार ह.भ.प. बापूसाहेब महाराज मळोलीकर करीत आहेत.
आळंदी पासून गेली 18 दिवसांपासून पायी चालत आलेला हा सोहळा आज वाखरी तळावर विसावला. आज सकाळपासून आकाशात ढगांनी गर्दी केली होती अधून मधून पावसाच्या हलक्या सरी अंगावर शहारे आणत होत्या. रिंगण संपल्यानंतर माऊली वाखरी येथील पालखी तळावर विसावली. यावेळी पाऊस चालूच होता. परंपरेने आलेली किर्तनसेवा भर पावसात ह.भ.प. बापूसाहेब देहूकर यांनी केली. या वेळी त्यांनी श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या ‘सुखे घेऊ जन्मांतरे l एक बरें इहलोकीं ll’ या अभंगावर विस्तृत असे विवेचन केले.
यावेळी ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर म्हणाले की, या इहलोकामध्ये आम्ही सुखाने म्हणजे आनंदाने जन्म घेऊन संसार हा दुःखाने भरला असला तरी वारी करण्यासाठी किंवा देवाची भक्ती करण्यासाठी परत परत जन्म घेण्यासाठी तुकाराम महाराज तयार आहेत. जन्मास येण्याअगोदर ही दुःख असून जन्मानंतर ही दुःख आपली पाठ सोडायला तयार नसून यातून मार्ग काढण्यासाठी पांडुरंगाचे चिंतन करणे आवश्यक असून त्यांच्या नामस्मरणाने आमच्या जीवनातील दुःख नक्की कमी होईल. आम्ही जन्माला येऊ ते केवळ आणि केवळ वारी करण्यासाठीच. जीवनात जर वारी घडत असेल तर असे अनेक जन्म घेण्यासाठी तुकाराम महाराज तयार आहेत. आणि अशी पंढरीची वारी जर या जन्मात घडत असेल तर जीवनाचं सार्थक होईल.
श्री संत तुकाराम महाराज यांना वारीची अनुभूती आली आणि ते आपणांस सांगतात की, माझ्याप्रमाणे तुम्हास ही आपल्या जीवनाचं सार्थक करायचे असेल तर ही पंढरीची वारी करा. तुम्ही ही या वारीचा अनुभव घ्या जीवनातील सर्व संग हे बाधक आहेत म्हणून श्री संत तुकाराम महाराज यांनी वारीकरीता त्याग केला आहे. वारीबद्दलचे महत्व या अभंगातून श्री संत तुकाराम महाराज यांनी अगदी ओतप्रोत भरलं असून सामान्य जीवनाचा उद्धार करण्यासाठी ही वारी आहे.
यावेळी अनेक पालखी सोहळ्यातून आलेले महाराष्ट्रातील भाविक, किर्तनकार, फडकरी मंडळी उपस्थित होती. अगदी पाऊस चालू असतानाही भगवंतावर निष्ठा ठेवून केलेली ही कीर्तनाची सेवा समाजास दिशा देण्याचे कार्य करणार हे निश्चित आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng