मोहिते पाटलांचा वाडा उध्वस्त करा – माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

माळशिरस (बारामती झटका)
५० वर्षे मोहिते पाटील यांच्या घराकडे पंचायत समिती पासून ते राज्यापर्यंत सत्ता होती. या लोकांना सत्तेचा हव्यास आहे. भाजप सत्तेत आल्यावर मोहिते पाटील भाजपमध्ये आले. भाजपने त्यांना खूप काही दिले मात्र, ते विसरले. त्यांनी अनेक कारखाने, पतसंस्था उध्वस्त केल्या. आता त्यांचा वाडा उध्वस्त करण्याची वेळ आली आहे, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माळशिरस येथील सभेत सदाभाऊ खोत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, तुम्ही शरद पवारांसोबत का गेलात. त्यांच्या घरातील लोक त्यांना सोडून जात आहेत. अजित पवार त्यांना कंटाळून बाहेर पडले पवारांनी आत्तापर्यंत शेका पक्ष संपवला, कम्युनिस्ट पक्ष संपवला, अनेक नेत्यांना संपवले. ते राज्याचे शकुनी मामा आहेत. अशा या मामांचा पराभव जनता यंदा निश्चित करेल आणि माढ्यात क्रांती होईल, असे खोत म्हणाले. मोदी सत्तेत आल्यापासून चोहोबाजूने विकास झाल्याचेही ते शेवटी म्हणाले.
मतदारांच्या भविष्यासाठी भाजपचाच – आ. बबनदादा शिंदे
उजनीवर १६ ते १८ धरणे आहेत, ते भरल्याशिवाय आपल्याला खाली पाणी येत नाही याला पर्याय म्हणून कृष्णा नदीचे पाणी फ्लड डायव्हर्शनने आणावे लागणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर प्रयत्न करत आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या भविष्यासाठी भाजपाला निवडून देणे आवश्यक असल्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी सांगितले. भाजपकडे आज नरेंद्र मोदी आहेत. विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. राज्यात त्यांचे एक दोन उमेदवारच निवडून येणार आहेत. ते दिल्लीत जाऊन काय करणार, असा सवाल आ. बबनदादा शिंदे यांनी केला. मोदी यांनी देशाचा विकास गतीने केला आहे. प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात रस्ते झाले आहेत .त्यामुळे ४०० पार खासदार करण्यासाठी भाजपच्या मागे उभे रहा आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून द्या, असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले.
सिंचन प्रकल्प मार्गी – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
२०१९ च्या सभेदरम्यान देवेंद्रजी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासमोर मतदारसंघातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ते पाच वर्षात पूर्ण केले. सर्व तालुक्यातील सिंचन प्रकल्प मार्गाला लागले, असे प्रतिपादन खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही सहकार्य लाभले. मागील वेळी संजयमामा शिंदे यांच्या विरोधात उभारले मात्र, आमची मागील वीस वर्षांपासून मैत्री आहे. विरोधात असलं तरी संजयमामा महायुतीत आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी मला करमाळ्यातून मताधिक्य देण्याचे जाहीर केले. बबनदादा यांनीही मदत केली. आमदार शहाजीबापू पाटील, आमदार जयकुमार गोरे, रश्मी बागल हेही माझ्यासोबत आहेत. त्यांचे आभार मानतो. ७ मे रोजी मला पुन्हा निवडून द्यावे. यापुढे जास्तीत जास्त कामे मतदार संघात करेल, असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.
चार जूनला गुलालच – जीजामाला नाईक निंबाळकर
मोदींच्या सभेनंतर उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सभेची गर्दी पाहता गुलाल आमचाच आहे, हे दाखवून दिले, असे त्या म्हणाल्या. सभेनंतर कुटुंबीयांचा उत्साह वाढला असून रणजितसिंह यांच्या पत्नीने विजयाचा विश्वास व्यक्त केला. सभा अतिशय छान झाली. सर्वांची भाषणे उत्तम झाली, सभेची गर्दी पाहून लक्षात येईल की, रणजितसिंह नाईक निंबाळकर व पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी लोक भक्कमपणे उभे आहेत. एवढ्या उन्हातान्हात सभेला गर्दी होती. रणजीतसिंह नाईक निंबाळकर पुन्हा खासदार होणार आहेतच, केवळ कुठल्या तालुक्याचा किती वाटा आहे, हेच पाहायचे आहे. अशा शब्दात जिजामाला नाईक निंबाळकर यांनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला. माण-खटाव, फलटण तालुक्यात चांगली परिस्थिती आहे. आम्ही गल्लोगल्ली, घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत, यामुळे ४ जून रोजी रणजीतसिंहांचा गुलाल असणार आहे, भाजपाचा गुलाल असणार आहे, अर्थात नरेंद्र मोदींसाठीच असणार आहे, असेही जिजामाला यांनी म्हटले आहे. तसेच मोदींची सभा खाली बसून बघण्यात वेगळीच मजा आहे, त्यामुळे आम्ही खाली प्रेक्षकांमध्ये बसून मोदींची सभा ऐकल्याचंही त्यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा