आदिनाथची निवडणूक बिनविरोध करा – हरिदास डांगे
करमाळा (बारामती झटका)
आदिनाथ सहकारी साखर कारखाना खाजगीकरण होता होता वाचविण्याचे काम आदिनाथ बचाव समितीने केले आहे. यापुढील काळात आदिनाथ ला चांगले दिवस आणायचे असेल तर येणारी निवडणूक बिनविरोध करा, असे आव्हान बचाव समितीचे अध्यक्ष हरिदास डांगे यांनी केले आहे.
आदिनाथ बचाव समितीच्यावतीने आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच कारखान्यासाठी मोफत पाणी देणारे शेतकरी व कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार बचाव समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बचाव समितीचे निमंत्रक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन रामदास जोड, आदिनाथचे माजी संचालक व चेअरमन शहाजीराव देशमुख, पंचायत समितीचे
सभापती अतुल पाटील, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जाधव, आदिनाथचे संचालक डॉ. वसंतराव पुंडे, मकाईचे माजी संचालक सुभाषराव शिंदे, वांगीचे केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, पारेवाडीचे उदयसिंह मोरे पाटील, प्राचार्य जयप्रकाश बिले, शिवसेनेचे निखिल चांदगुडे, संजय शीलवंत, विशाल गायकवाड, आजिनाथ इरकर, नागेश शेंडगे, गणेश करे पाटील, दत्तात्रेय गिरमकर, युवराज रोकडे, किशोर बागल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हरिदास डांगे म्हणाले की, आदिनाथ कारखान्याची निवडणूक तात्काळ घेणे गरजेचे आहे. संचालक मंडळाने जाणीवपूर्वक निवडणूक घेण्यास दिरंगाई केली तर बचाव समिती याबाबतीत आवाज उठवणार आहे.
आदिनाथ कारखान्याला इथेनॉल प्रकल्प मंजूर करण्यासाठी बचाव समिती प्रयत्नशील आहे. यासाठी एक मुखी एक वचनी संचालक मंडळ पाहिजे.
तसेच यावेळी बोलताना किशोर पाटील म्हणाले की, मगरीच्या तोंडातून तुकडा काढावा, तसा आदिनाथ कारखाना बारामतीकरांच्या तोंडातून काढला आहे. आज खऱ्या अर्थाने सहकार तत्वावरचा कारखाना, आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र आहे. बचाव समितीने पुढाकार घेऊन बचाव समितीचे पॅनल उभा करावे.

यावेळी बोलताना प्राध्यापक रामदास जोड म्हणाले की, आदिनाथ कारखान्याला मदत करण्याची भूमिका असणारे संचालक मंडळ निवडून देणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी कारखान्याचे संचालक व्हायची, अशा प्रवृत्तीची लोकसंख्या संचालक मंडळात नको आहेत.
यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी बारा कोटी रुपयांचा निधी स्वतःच्या खिशातून आदिनाथ कारखान्याला मदत म्हणून दिला आहे. खऱ्या अर्थाने हा कारखाना वाचविण्याचे काम प्राध्यापक तानाजी सावंत, शिवाजी सावंत यांनी केले आहे. यामुळे येणारी निवडणूक तानाजी सावंत व शिवाजी सावंत यांना विश्वासात घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करावी.
यावेळी बोलताना सभापती अतुल पाटील म्हणाले की, आदिनाथ कारखाना हा करमाळा तालुक्याचा स्वाभिमान असून चांगले विचाराचे लोक येथे आणले पाहिजेत. आदिनाथ कारखान्यामधून ज्या लोकांनी जवळपास 14 कोटी रुपये ऍडव्हान्स म्हणून रक्कम उचलली आहे, त्यांनी ती तात्काळ कारखान्यात भरावी. अन्यथा, या लोकांच्या दारात वसुलीसाठी सभासदांना जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचा अभिनंदन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिनाथ कारखान्याला थक हमी देऊन इथेनॉल प्रकल्पाला मान्यता देऊन शंभर कोटी रुपयांचे भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बचाव समितीची शिष्टमंडळ आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली.
युवा नेते दत्ता जाधव म्हणाले की, आदिनाथ कारखान्यावर कब्जा घेण्यासाठी आलेल्या बारामतीच्या गुंडांना पळवून लावण्याचे काम माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी उभा केलेला कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहिला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही बचाव समितीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, असा विश्वास व्यक्त केला.
वेळ पडली तर बचाव समिती निवडणूक लढवणार
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी. तालुक्यातील सर्व गटातटाचे नेते मंडळींनी एकत्रच बसावे व निवडणुकीचा खर्च वाचवावा. चांगल्या विचारांचे प्रत्येक गटाची माणसे घेऊन निवडणूक करावी. मात्र, या निवडणुकीच्या माध्यमातून कोणी जर राजकारण करत असेल, तर एक सक्षम पर्याय म्हणून आदिनाथ साखर कारखाना बचाव समिती स्वतंत्र पॅनल उभा करेल, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng