शिंदे – फडणवीस सरकारने सूड बुद्धीने वागून सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची शिवभोजन थाळी बंद करू नये
दुसऱ्यांची कामे पुसून तुम्ही कोणता पराक्रम करताय ? राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ता रविकांत वरपे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल…
पुणे (बारामती झटका)
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन थाळी ही महत्वकांक्षी योजना सुरू केली. केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. मविआ सरकारच्या काळात सुरु केलेली शिवभोजन थाळी ही आताचे ED अर्थात शिंदे – फडणवीस सरकार बंद करणार आहेत. महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त सामान्य माणसाला राज्य सरकारने आणखी त्रासात ढकलून गोरगरीब मराठी माणसांच्या पोटावर लाथ मारू नये, असे केले तर, सामान्य जनता ह्यांना ह्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी सरकारकडे केले आहे.
शिवभोजन थाळीने कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या, रोजीरोटीची कामे बंद पडलेल्या कित्येक गरीब व गरजू जनतेला माफक दरात अन्न देण्याचं पुण्य केलं व संकट काळात आधार दिला. कोरोना काळात हाताला काम नसलेला एक मोठा कामगार वर्ग आहे, अशा गरजू कुटुंबासाठी ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजुर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न शिवभोजन थाळीच्या माध्यमातून सोडवला, असे वरपे म्हणाले.

कोरोना काळात अनेकजणांचे रोजगार गेले, छोटे-मोठे उद्योग बंद पडले, कोणाच्याही हाताला यावेळी काम नव्हते, महागाई सुद्धा वाढत आहे. त्यामुळे गोरगरीब, कष्टकरी जनतेला माफक दरात पोटभर जेवण जेवायला मिळावं या हेतूने महाविकास आघाडी सरकारच्या संकल्पनेतुन ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. शिवभोजन थाळीचे जवळपास २००० केंद्र सुरु केले आणि ५ ते १० रुपयात पूर्ण जेवण गोरगरिबांसाठी सुरु केले आणि लोकांनी सुद्धा ह्या थाळीला प्रचंड प्रतिसाद दिला. या शिवभोजन थाळीचा सुमारे ९ कोटी लोकांनी लाभ घेतला असल्याची माहिती वरपे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.
१० रुपयात शुद्ध पोटभर जेवण देण्याचा हा निर्णय, कोरोना संकटात लाखो निराश्रित नागरिकांच्या पोटाचा आधार ठरला होता. पण, खोके खाऊन ओक्के झालेल्या ह्या गद्दार सरकारला मविआ सरकारची कावीळ झालीय म्हणूनच मविआ सरकारने घेतलेल्या अनेक लोकाभिमुख निर्णयांना ह्या सरकारने एकतर स्थिगिती दिली किंवा ते रद्द केले आहेत. मेट्रो कारशेड कांजूरला हलवणे, आरे मध्ये कारशेडच्या कामावर घातलेली बंदी, किंवा आताचा शिवभोजन थाळी, जे निर्णय लोकांच्या पसंतीस आले होते, ते सर्व निर्णय या खोके सरकारने रद्द करण्याचा किंवा विकासकामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला.
दुसऱ्याची रेष छोटी दाखवण्यासाठी आपली रेष मोठी ओढायची असते, दुसऱ्यांची कामे पुसून तुम्ही कोणता पराक्रम करताय ? असा सवालही वरपे यांनी यावेळी केला आहे. तुम्ही कितीही द्वेषाने वागला तरी ह्यात नुकसान महाराष्ट्राचे होत आहे, हे या गद्दार ED सरकारला कळत नाही. पण जनता ह्यांना ह्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे रविकांत वरपे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे म्हटले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng