पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महमार्गावर वृक्षारोपण…

वेळापूर (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज व अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे पायी वारी करत, मुक्काम विसावा असा मजल दरमजल प्रवास करीत हरिनामाच्या जयघोषामध्ये येत असतात. अशा वेळी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे या न्यायाप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांच्या शुभहस्ते माऊलींच्या पालखी स्थळावर व विसावा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, वेळापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस मित्र व विभागातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.


कैवल्य साम्राज्य माऊलींच्या पालखीचे आगमन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात धर्मपुरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये होत असते. पहिला मुक्काम नातेपुते, दुसरा मुक्काम माळशिरसला झाल्यानंतर माऊलींची पालखी खुडूस येथील गोल रिंगण सोहळा आटोपून दुपारी निमगाव पाटी या ठिकाणी थांबत असते. तेथून दुपारनंतर पालखी मार्गस्थ होते. वेळापूरच्या दिशेने वेळापूर हद्दीमध्ये धावा नयनरम्य पालखीतील पाहण्यासारखा सोहळा होत असतो. आलेले भाविक पंढरपूरच्या दिशेने ज्ञानोबा माऊलीचा गजर करत पळत असतात. लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत महिला, पुरुष या धाव्याचा आनंद घेत असतात. पालखी वेळापूर मुक्कामाच्या दिशेने जात असताना धावा झाल्यानंतर विसावा केला जातो. या ठिकाणी सुप्रसिद्ध भारूडकार यांचे भारुड होत असते. श्री. महादेवराव ताटे यांच्या जागेमध्ये विसाव्याचा मान आहे. त्यानंतर वेळापूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा चौकामध्ये मुक्काम असतो.
माऊलींच्या विसावा व मुक्काम या ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये वृक्षतोड झालेली आहे. शासनाने वृक्ष लागवड उपक्रम हाती घेतलेला आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिनकर यांनी वृक्षारोपण पालखी महामार्गावर केलेले होते. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सुद्धा वृक्षारोपण करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.