ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १९ जूनला प्रस्थान

आळंदी (बारामती झटका)
यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी १९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. परंपरेनुसार १९ जूनला रात्री आठच्या सुमारास वाजत -गाजत माऊलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होईल.
दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. २० जून व २१ जूनला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. दि. २२ व २३ जूनला सासवड, त्यानंतर २४ जूनला जेजुरी, २५ जूनला वाल्हे, त्यानंतर नीरा स्नाननंतर २६ जूनला पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी जाईल. दोन दिवस पालखीचा मुक्काम होता. मात्र यंदा लोणंदला एकच दिवस पालखी मुक्कामी असेल. त्यांनतर २७ जूनला चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण सोहळा साजरा करून पालखी तरडगाव मुक्कामी जाईल. २८ जूनला फलटण, २९ जूनला बरड, ३० जूनला नातेपुते, १ जुलैला पुरंदावडे येथे पहिले गोल रिंगण घेऊन पालखी माळशिरसला मुक्कामी जाईल. २ जुलैला सकाळचा विसावा असलेल्या खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण सोहळा घेऊन पालखी वेळापूर मुक्कामी जाईल. ३ जुलैला भंडीशेगाव, ४ जुलैला वाखरी तर ५ जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहचणार असून मुख्य आषाढी एकादशी सोहळा संपन्न होईल.
पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा ६ जुलैला संपन्न होईल. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब येथे पाहिले उभे रिंगण, पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण, खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, ठाकुरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण, वाखरीच्या बाजीराव विहीर येथे दुसरे उभे व चौथे गोल रिंगण, इसबावी पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी तिसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर १० जुलैला पालखी परतीचा प्रवास सुरू करेल. ११ दिवसांचा पायी प्रवास करून पालखी सोहळा पुन्हा २० जुलैला आळंदीत दाखल होणार असल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.