सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र रद्द करण्याची जैन समाजाची मागणी
आज करमाळ्यात निघणार भव्य मोर्चा
करमाळा (बारामती झटका)
झारखंड राज्यातील श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांचे प्राचीन तीर्थक्षेत्र असून या ठिकाणाला राज्य शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले असून जैन समाजाचा या निर्णयाला प्रचंड विरोध असून याचा निषेध करण्यासाठी आज बुधवार दि. 21 डिसेंबर रोजी करमाळा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे निवेदन आज जैन समाजाच्या वतीने करमाळा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, सम्मेद शिखर हे जैन धर्मियांसाठी पवित्र स्थान आहे. याला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाली तर या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य होऊन या पर्यटन स्थळाचा फायदा घेऊन मांसाहारी हॉटेल, बार, दारूचे दुकाने भविष्यात सुरू होणार आहेत. यामुळे श्री सम्मेद शिखराचे पावित्र्य धोक्यात येण्याची भीती आहे.

श्री सम्मेद शिखर यांच्या दर्शनासाठी संपूर्ण जगातून जैन धर्माचे भक्त येत असतात. याला पर्यटन स्थळ जाहीर करा, अशी कोणीही मागणी केलेली नाही. मात्र, तरीसुद्धा जाणीवपूर्वक या तीर्थस्थानाला पर्यटन स्थळ जाहीर करून जैन धर्मियांची भावना दुखण्याचे काम झारखंडमध्ये सुरू आहे. याला विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील जैन बांधवांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाची सुरुवात जैन मंदिर करमाळा येथून होणार आहे व तहसील कचेरी येथे त्याचा समारोप होणार आहे.
मोर्चाचे निवेदन देण्यासाठी जैन समाजातील नवीन मुथा, जगदीश अग्रवाल, जितेश कटारिया, पिंटू शेठ बलदोटा, यशराज दोशी, अशीष दोशी, पिंटू शेठ कटारिया, सुदर्शन गांधी, अरुण काका जगताप आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng