सायकल पंक्चर काढण्याची पत्र्याची पेटी ते चार मजली टोलेजंग इमारतीचा खडतर थक्क करणारा प्रवास..

रेणुका निवास या नूतन वास्तूचा गृहप्रवेश, वास्तुशांती समारंभ व सत्यनारायण महापूजा..
माळशिरस (बारामती झटका)
माणसाने कोणत्या परिस्थितीत जन्म घेतला आहे यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व परिस्थितीशी सामना करून कष्टाच्या घामाने परिश्रमाने किती आणि काय कमावलं, हे महत्त्वाचं आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता रस्त्यावर सायकल पंक्चर व्यवसाय करताना गाळा शेड असे कोणतेही साधन नसताना पत्र्याच्या पेटीत सामान ठेवून व्यवसायास सुरुवात केली. जीवनामध्ये अनेक यशस्वी व्यवसाय केले मात्र, व्यवसायाची सुरुवात सायकल पंक्चर काढण्याची पत्र्याची पेटी कायम स्मरणात ठेवून उत्तरोत्तर प्रगती करून आज चार चाकी गाडीत फिरून चार मजली टोलेजंग इमारतीचा खडतर थक्क करणारा प्रवास श्री. दत्तात्रय राजाराम सपकाळ उर्फ तात्या आणि समस्त सपकाळ परिवार यांचा आहे…
राजाराम कृष्णा सपकाळ व सुभद्रा राजाराम सपकाळ सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. शेती हा प्रमुख व्यवसाय. त्यांना दत्तात्रय, महादेव व शिवाजी अशी तीन रत्न ब्रह्मा, विष्णू, महेश अशी आहे. प्रतिकूल परिस्थितीत दत्तात्रय यांनी शिक्षणापेक्षा उद्योग व्यवसायाकडे लक्ष दिले. महादेव व शिवाजी यांना शिक्षण दिले. प्रतिकूल परिस्थितीमुळे उद्योग व्यवसाय करण्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते, जागा नव्हती, भाडोत्री गाळा शेड किंवा पत्रा मारण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती, अशा प्रतिकूल परिस्थितीत रस्त्यावर मोटरसायकल पंक्चर दुकान सुरू केले. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता गरिबीचे चटके असल्याने उन्हाचे चटके कमी बसत होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत व्यवसायाला सुरुवात केली.
दिवसेंदिवस काळ बदलत गेला. सपकाळ परिवार यांच्याकडे न्यूज पेपर एजन्सी होती. नवरात्र उत्सवामध्ये शहरात घट बसविण्याकरता डोक्यावर मातीची पाटी घेऊन शहरांमध्ये माती सुद्धा विकलेली होती. रसवंती गृह सुरू केले. त्यानंतर झुणका भाकर केंद्र सुरू केले. रेणुका हॉटेल एसटी स्टँड समोर सुरू करून दुसरी शाखा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी म्हसवड चौक या ठिकाणी सुरू केली. चार चाकी वाहनांमधून वर्दी सुरू केली. मेडिकल स्टोअर्स सुरू केले. असे अनेक व्यवसाय करीत सपकाळ परिवार यांनी आपली उन्नती साधलेली आहे.
राजाराम व सुभद्रा यांचा आशीर्वाद व आदर्श घेऊन सपकाळ परिवार यांची वाटचाल सुरू होती. काही वर्षांपूर्वी राजाराम सपकाळ यांचे दुःखद निधन झालेले आहे. पितृत्व आणि मातृत्व दोन्हीही जबाबदाऱ्या सुभद्रा सपकाळ सांभाळत आहेत. सपकाळ परिवार यांची दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. त्यांना गजानन, रेणुका देवी आणि खंडोबाचा आशीर्वाद कायम राहिलेला आहे. रेणुका निवास या नूतन वास्तूचा गृहप्रवेश वास्तुशांती समारंभ व सत्यनारायण महापूजा शनिवार दि. २७/६/२०२६ रोजी सकाळी ७ वाजता मंगल प्रसंगी विधीला सुरुवात होणार आहे. एक वीट श्रमाची, एक वीट कष्टाची, एक वीट आई-वडिलांच्या आशीर्वादाची, एक वीट भावांच्या साथीची, आता हवी आहे एकच वीट आपल्या सहकार्याची… अशा पद्धतीने सौ. शकुंतला व श्री. दत्तात्रय राजाराम सपकाळ, सौ. कल्पना व श्री. महादेव दत्तात्रय सपकाळ, सौ. रत्नावली व श्री. शिवाजी दत्तात्रय सपकाळ, सौ. शिवानी व श्री. चैतन्य महादेव सपकाळ, सौ. काजल व श्री. साकेत शिवाजी सपकाळ, श्रीमती सुभद्रा राजाराम सपकाळ यांना स्नेहांकित ठेवून सौ. गायत्री व श्री. रवींद्र दत्तात्रेय सपकाळ, सौ. स्वाती व श्री. अनिल दत्तात्रेय सपकाळ, नामदेव रवींद्र सपकाळ, राहुल रवींद्र सपकाळ, श्रुतिका अनिल सपकाळ, ईश्वरी अनिल सपकाळ आणि सपकाळ परिवार माळशिरस यांच्या वतीने रेणुका निवास, शहा धारशी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे माळशिरस, ता. माळशिरस येथे स्नेह भोजनासाठी दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत उपस्थित राहावे, असे सपकाळ परिवार यांचे कडून कळविण्यात येत आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



