मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक संवेदनशील नेतृत्व – विलासराव घुमरे
करमाळा (बारामती झटका)
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही भूमिका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने समाजकारण करत असून त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे आज राज्यातील रुग्णसेवा मजबूत होत असल्याचे मत विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या वतीने करमाळा तालुक्यातील २२ दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात व पाय देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर करमाळा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर, सुरताल संगीतचे संचालक नरारे सर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपतालुकाप्रमुख नवनाथ गुंड, युवा सेना तालुकाप्रमुख श्रीकांत गोसावी, उपतालुका प्रमुख दादा थोरात, जेऊर शाखाप्रमुख महादेव सुरवसे, जेष्ठ पत्रकार कबीर प्राध्यापक, अशोक नरसाळे, शिवसेना कोळगाव प्रमुख नागेश शेंडगे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना विलासराव घुमरे म्हणाले की, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात सर्वसामान्यांना न्याय मिळण्याचे एक नवीन ठिकाण तयार झाले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय पक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे करमाळ्याचे सुपुत्र असून त्यांचा प्रत्येक तालुका वासियांना अभिमान आहे. कृत्रिम पाय बसवण्यासाठी 40 हजार रुपये खर्च येतो या ठिकाणी सर्वांना मोफत कृत्रिम हात व पाय देण्यात आले.
रत्ननिधी ट्रस्टचे राजीव सर यांनी करमाळा तालुक्यातील सर्व दिव्यांग लोकांना मोफत अवयव देण्याचे नियोजन केले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला हे अवयव देण्यात येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लाभार्थ्यांना अजून कृत्रिम हात व पाय देण्यात येतील, असे प्रतिपादन शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी करमाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर म्हणाले कि, मुख्यमंत्री वैद्यकीय निधीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील रुग्णांना ८० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य रुग्णांना मदत केली आहे.
शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक बांधवांनी याचा लाभ घेतला.