सत्तेपुढे शहाणपण चालत नाही – आण्णा हजारे

अहमदनगर (बारामती झटका)
आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक झाली आहे. दिल्ली सरकारच्या दारु धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. ज्यांच्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले, आण्णा हजारे यांनी केजरीवालांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
आण्णा हजारे म्हणाले की, केजरीवाल यांच्यासारखा माणूस आधी माझ्यासोबत काम करायचा. तेव्हा आम्ही दारुविरोधात आवाज उठवायचो. परंतु, आता मात्र ते दारु धोरण बनवत आहेत. मला या गोष्टीचे खूपच दु:ख झाले आहे. परंतु करणार काय ? सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही.
आण्णा पुढे म्हणाले की, दारु धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, हे सगळे त्यांच्या कृतीमुळे झाले आहे. त्यांनी ते सगळे केले नसते तर अटकेचा संबंधच नव्हता. आता जे होईल ते कायद्याच्या दृष्टीने होईल. अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी तब्बल १० समन्स दिल्यानंतर ईडीने अखेर अरविंद केजरीवाल यांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाली. त्यानंतर केजरीवाल यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधातली याचिका मागे घेतली आहे. खालच्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने ही याचिका मागे घेतल्याचे केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.