ग्राहक दिना दिवशी तरी शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे – श्रीकांत बाविस्कर

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमास सर्व माळशिरस तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. परंतु, एकही अधिकारी या कार्यक्रमाकडे येत नाही हे दुर्दैव आहे. याबाबत योग्य ती समज सर्व अधिकार्यांना द्यावी, अशी मागणी ग्राहक तक्रार निवारण मंच बारामती, कोल्हापूर, रत्नागिरी झोनलचे श्रीकांत बाविस्कर यांनी बोलताना केली आहे.
तहसील कार्यालय माळशिरस, ग्राहक पंचायत महाराष्ट्र व अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र विद्युत निर्माण नेमलेल्या ग्राहक तक्रार निवारणामध्ये ग्राहकाला कोणतीही फी न करता आपली तक्रार नोंदवता येते व ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये एकही रुपयाही खर्च करता, कोणताही वकील न लावता आपली केस आपण लढू शकतो व आपण विद्युत महामंडळाकडे महामंडळाच्या तक्रारीचा न्याय मागू शकतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांनी, वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी, तसेच ग्राहक कायदा 1986 बाबत अभ्यासपूर्ण विवेचन करून ग्राहकांनी प्रत्येक ठिकाणी कसे जागृत राहिले पाहिजे, याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ग्रामपंचायत महाराष्ट्राचे माळशिरस तालुका अध्यक्ष डॉ. दत्तात्रय थोरात म्हणाले की, ग्राहकाची फसवणूक किती झाली हे महत्त्वाचे नसून ती फसवणूक का झाली आणि त्या संदर्भात आपण दाद मागितली पाहिजे. त्यामुळे ग्राहकांनी वस्तूची किंमत न पाहता आपल्याला न्याय मिळवण्यासाठी ग्राहकाने जरूर जागृत राहिले पाहिजे, असे सांगितले.
यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष उपेंद्र केसकर यांनी ग्राहक कायद्याविषयी मार्गदर्शन केले. ग्राहक कायदा 2019 हे ग्राहकाचे कवच कुंडल आहे, याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. देशातील ग्राहक चळवळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना, कार्यपद्धती, 2019 कायद्यातील तरतुदी याबाबत त्यांनी भाष्य केले. तसेच तालुक्यात चालू असलेल्या ग्राहक प्रबोधनाची माहिती दिली. उपस्थितांना ग्राहक चळवळीत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. लोकशाही दिन सुरू करणेबाबत लेखी निवेदन देण्यात आले.

निमंत्रण देऊनही इतर शासकीय अधिकाऱ्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यावेळी अमित पुंज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी पुरवठा निरीक्षक सुशांत केमकर, दशरथ जरग, सुप्रिया वजाळे मॅडम, आमीर तांबोळी, आकाश कदम, अजर मणेरी, बाळासाहेब झंजे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सोलापूर ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भगवान घुगरदरे, दस्तगीर मुलाणी, वामनराव वाघमोडे, हारून शेख, स्वप्नील राऊत, संजय हुलगे, तानाजी वाघमोडे, सिद, ऋषिकेश थोरात तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.