माळशिरस येथे तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव संपन्न

माळशिरस (बारामती झटका)
आदिवासी समाज सुधारक श्री. बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पौष्टिक, विविध रोग, व्याधी यावर कारगर उपाय असलेल्या आरोग्य व आहारदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या नैसर्गिकरित्या येणाऱ्या रानभाज्यांचा व त्यांच्या पाककृतींचा महोत्सव, प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस येथे संपन्न झाला. रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री. सुरेश शेजुळ यांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार श्री. जगनाथ मगर यांच्या हस्ते झाले.

सदर महोत्सवात विविध प्रकारच्या २४ रानभाज्यांचे नमुने व पाककृती अधिनस्त कृषी सहाय्यक व तालुक्यातील कृषी शेतकरी बांधव यांनी सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सुरेश शेजुळ तहसीलदार, माळशिरस यांनी आपल्या मार्गदर्शनात रानभाज्यांची व्यापक प्रचार, प्रसार व प्रसिद्धी करणेबाबत आवाहन केले. श्री. जगन्नाथ मगर यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व विषद करून याची लागवड परस बागेत करण्याबाबत आवाहन केले.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सतीश कोळेकर यांनी केले. सदर महोत्सवासाठी सौ. सारिका एकपुरे, सौ. स्वप्ना गोफने व सौ. विदया माळी यांनी स्वादिष्ट, रुचकर रानभाज्याची पाककृती व पक्वान्नाचे सादरीकरण केले व उपस्थितांना चवीसाठी उपलब्ध करून दिले. सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन आयोजन श्री. सतीश कचरे मंडल कृषी अधिकारी, नातेपुते श्री. कुलदीप ढेकळे तालुका तंत्र व्यवस्थापक, आत्मा व सौ. रेश्मा क्षीरसागर सहाय्यक तंत्र व्यवस्थापक, आत्मा माळशिरस यांनी यासाठी परिश्रम घेतले. तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सवासाठी तालुका अधिनिस्त कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, पुरस्कार प्राप्त शेतकरी व शेतकरी बांधव यांनी उपस्थिती दर्शवली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.