केवळ एक हप्ता भरला अन् दुर्दैवी निधनानंतर राऊत कुटुंबाला मिळाला १२.९० लाखांचा आधार; एलआयसीची तत्परता

अकलूज (बारामती झटका)
भविष्यातील अनिश्चिततेचा विचार करून घेतलेला विमा एखाद्या कुटुंबासाठी किती मोठा आधार ठरू शकतो, याचे जिवंत उदाहरण अकलूजमध्ये पाहायला मिळाले. शिंगणापूर घाटातील भीषण अपघातात निधन झालेले आनंदनगर (अकलूज) येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते योगेश दत्तात्रय राऊत यांचा १२ लाख ९० हजार रुपयांचा विमा क्लेम मंजूर झाला असून, ही रक्कम त्यांचे वडील दत्तू बाबा राऊत यांच्या बँक खात्यात NEFT द्वारे यशस्वीपणे जमा करण्यात आली आहे.
केवळ एका हप्त्यात मिळाले पूर्ण संरक्षण
योगेश राऊत यांनी २२ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) ६ लाख २५ हजार रुपयांची (मूळ विमा) पॉलिसी घेतली होती. यासाठी त्यांनी ५० हजार रुपयांचा केवळ एक वार्षिक हप्ता भरला होता. दुर्दैवाने, वर्ष पूर्ण होण्याआधीच ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. परंतु, विम्याच्या नियमानुसार संरक्षण लागू असल्याने, एलआयसीने विम्याची पूर्ण रक्कम आणि बोनस मिळून एकूण १२ लाख ९० हजार रुपयांचा क्लेम मंजूर केला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर ओढवलेल्या या संकटात या रकमेमुळे राऊत कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
तत्पर सेवा आणि मोलाचे सहकार्य
हा क्लेम अत्यंत कमी वेळेत मंजूर करून आणण्यासाठी विमा प्रतिनिधी सागर वरकड आणि विकास अधिकारी अमोल काळे साहेब यांनी विशेष पुढाकार घेऊन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली. या कामात कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी सुजय माने-पाटील, शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्राध्यापक बागडे सर, दत्तात्रेय शेलार आणि किरण मोहिते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच या कठीण काळात समस्त गावकऱ्यांनीही राऊत कुटुंबाला खंबीर पाठिंबा दिला.
विमा हेच खरे सुरक्षा कवच
ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या त्या हृदयद्रावक अपघातानंतर संपूर्ण अकलूज परिसरावर शोककळा पसरली होती. मात्र, योगेश राऊत यांनी आपल्या हयातीत घेतलेल्या या विमा पॉलिसीमुळे आज त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभले आहे. कमी गुंतवणुकीत कुटुंबाला मोठे आर्थिक संरक्षण कसे मिळू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
“माणूस गेल्याची पोकळी कधीच भरून निघत नाही, परंतु संकटसमयी कुटुंबाची आर्थिक ओढाताण होऊ नये, यासाठी विमा किती महत्त्वाचा आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते. योगेश यांच्या पश्चात हा निधी त्यांच्या वडिलांच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी नक्कीच आधारवड ठरेल.”
राऊत कुटुंबाने या कठीण काळात एलआयसी प्रतिनिधी, अधिकारी, सर्व सहकार्यकर्ते आणि गावकऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



