आदिनाथ कारखान्याच्या जप्त केलेल्या साठ्यामधून 515 क्विंटल साखर माजी संचालकांनी परस्पर विक्री केल्याचा संजय गुटाळ यांचा आरोप

करमाळा (बारामती झटका)
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमधील साठ्यामध्ये 515 क्विंटल साखर कमी भरत असून साखरेची कारखान्यातून परस्पर विक्री झाल्याची शक्यता असून या प्रकरणी मागील संचालक मंडळाची कसून चौकशी करावी, अशी मागणी प्रशासकीय मंडळ सदस्य संजय गुटाळ व महेश चिवटे यांनी केली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये पाच हजार 725 क्विंटल साखर शिल्लक होती. ही साखर साखर आयुक्त मार्फत करमाळा तहसील कार्यालयाने जप्त केली होती.
साखरेचा तहसील कार्यालय मार्फत नायब तहसीलदार विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली लिलाव झाला. 5725 क्विंटल साखरेची
आनंद ट्रेडर्स या साखर व्यापाऱ्यांनी खरेदी केली. साखरेचे रीतसर पैसे करमाळा तहसीलदारांच्या खात्यावर भरले. प्रत्यक्षात साखर भरत असताना या साठ्यामध्ये 515 क्विंटल साखर कमी असल्याचे निष्पन्न झाले. मागील संचालक मंडळाच्या काळात या साखरेची परस्पर बेकायदेशीर विक्री झाली काय, असा प्रश्न महेश चिवटे यांनी उपस्थित केला आहे.

एक तर साखर द्या किंवा आमचे 515 क्विंटल साखरेचे पैसे परत द्या, अशी मागणी संबंधित आनंद ट्रेडर्स या साखर विक्रेत्याने करमाळा तहसीलदार यांच्याकडे केली आहे. तहसील कार्यालयाने सुद्धा याबाबत 515 क्विंटल साखर कमी का भरत आहे, याचा खुलासा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाकडे मागितला आहे.