एस. एम. हायस्कूल, कणकवली येथे पन्नास वर्षांपूर्वी शिकणारे विद्यार्थी आजी-आजोंबाच्या रुपात, स्नेहमेळा उत्साहात…

कणकवली (बारामती झटका) गुरुनाथ तिरपणकर यांजकडून
लहानपणीचे मित्र ५० वर्षापुर्वी एकाच शाळेत शिक्षण प्राप्त करताना त्यावेळचे कौटुंबिक वात्सल्य व जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या की मन सुखावतं व डोळे नकळत पाणावले जातात. त्याकाळचा हा प्रवास खडतर पण प्रेरणादायी होता. त्याच अनुषंगाने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एस. एम. हायस्कूल कणकवली १९७६ ची बॅच, वर्ष ५० वे आयोजित स्नेह मेळावा आचरा बीच रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तत्पुर्वी कणकवली येथील एस. एम. हायस्कूलच्या सभागृहात सेवा निवृत्त गुरुजींचा सत्कार व आशिर्वाद घेऊन १३ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित कार्यक्रमाला सुरुवात केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एम. हायस्कुल प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके सर यांची निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार जेष्ठ सेवा निवृत्त गुरुवर्य जी. ए. सावंत सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच सेवा निवृत्त गुरुवर्य नाईक सर, जी. ए. सावंत सर, श्रीमती सावंत मॅडम, करंबेळकर मॅडम, म्हसकर मॅडम यांचा सत्कार माजी विद्यार्थी ॲड. सतिश नाडकर्णी, डॉ. संदीप कदम, संजय पाध्ये, डॉ. सुनिता उपाध्ये, भारती वर्दम, निर्मला काणेकर यांनी केला. या सर्व गुरुवर्यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू व स्मृतिचिन्ह प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ गुरुवर्य जी. ए. सावंत सर यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच माजी विद्यार्थी डॉ. संदीप कदम व अशोक चिंदरकर यांनी शालेय जीवनातील जडणघडणीचा आलेख मांडला व जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुवर्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जी. एन. बोडके सर यांनी गुरु-शिष्याचे नाते दृढ आणि कीती घट्ट असते हे अधोरेखित केले व गौरवोद्गार काढले. आणि दुग्धशर्करा योग म्हणजे ५० वे वर्ष आणि १९७६ ची बॅच मुख्याध्यापक जी. एन. बोडके सर याचा जन्म १९७६ सालचा, म्हणजे हे माजी विद्यार्थी-विद्यार्थिंनी माझे मातापिता आहेत हे आवर्जून सांगितले व समाधान व्यक्त केले. आताचे गुरुशिष्याचे नाते ५० वर्षापूर्वीचे शालेय शिक्षण व आताची शिक्षण पध्दतीत जमीन आसमानचा फरक आहे व इतर बाबतीत सखोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी भरत तोरसकर यांनी काव्यमय पद्धतीने खुमासदार व उत्कृष्टरित्या केले. या शालेय कार्यक्रमानंतर दोन दिवसीय गेटूगेदरसाठी आचरा बीच रिसॉर्ट येथे मार्गस्थ झालो. आचरा रोड वरिल कांदळवन येथे बोट सफारी केली. वाडेकरकाका यांनी पर्यावरण, शास्त्रीय, नैसर्गिक, औषधयुक्त वनस्पती यासंदर्भात मौलिक माहिती दिली. ओझर येथे पांडव कालीन गुहेत ब्रम्हानंद स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. सिंधुदुर्ग कील्ला ते ओझर शिवकालीन भूयारी मार्गाची पहाणी केली. मालवण येथे जयवंत साळगावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुवर्ण गणेश मूर्तीचे दर्शन घेतले. तसेच राजकोट येथील उभारलेल्या भव्य अशा पुर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरात दर्शन घेतले व तेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या वटवृक्षाचे दर्शन घेतले. त्यानंतर आंगणेवाडी येथील मराठी देवीचे दर्शन घेतले. तसेच आचरा बीच रिसॉर्टवर एस. एम. हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. सुरेंद्र तावडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला व जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व माजी विद्यार्थीनींनी ५० वर्षाचा आपला जीवनपट आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केला. आशा ढेपसे हिने वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करवून घेतले व आगळीच गमतीदार रंगत आणली. सुरेखा करंबेळकर व भरत तोरसकर यांनी गाणी म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कवी डॉ. अनिल कांबळी व प्रज्ञा गोखले यांनी कविता सादर केल्या. शेवटी आडवली येथील स्वामी समर्थ मठात दर्शन घेऊन स्नेह मेळाव्याची सांगता झाली. स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय पाध्ये, नंदकिशोर आळवे, सतिश नाडकर्णी, प्रसाद देसाई, भरत तोरसकर यांनी विशेष मेहनत घेतली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



