शिर्डी, सोलापूर लोकसभेच्या दोन जागा रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात अन्यथा, भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल – मिलिंद सरतापे..!
सोलापूर (बारामती झटका)
लोकसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरू झाली असताना भाजपा माहितीच्या वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. अंतिम यादी जाहीर होणे बाकी आहे. त्यामध्ये शिर्डी लोकसभा, सोलापूर लोकसभा एसी साठी आरक्षित आहेत. या दोन जागा भाजपा माहितीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइं आठवले पक्षाला सोडण्यात याव्यात, अशी मागणी रिपाइंचे सर्वेसर्वा रामदासजी आठवले यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे. परंतु, त्यामध्ये कोणताही निर्णय झालेला नाही.
शिर्डी मतदारसंघातून रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले लढण्यासाठी इच्छुक आहेत तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे शिर्डी, सोलापूर या दोन जागेसाठी रिपाइंचे पदाधिकारी आग्रही आहेत. नव्याने महायुतीमध्ये दाखल होणाऱ्या मनसेसाठी एक दोन जागा सोडण्याची भाजपाची तयारी आहे.
आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विरोध नाही. परंतु गेली दहा वर्ष घटक पक्ष म्हणून महायुतीमध्ये असलेल्या रिपब्लिकन पक्षाला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे आल्याने भाजप महायुतीला जुना मित्र पक्ष रिपब्लिकन पक्षाचा विसर पडला की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.
भाजपा महायुतीने मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला विविध स्थानिक निवडणुकीमध्ये तसेच विविध शासकीय जिल्हा कमिटी, तालुका कमीटीवर कोणत्याही पदाधिकारी यांना संधी मिळाली नाही. तरीही राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचा शब्द प्रमाण मानून महायुतीचे काम प्रामाणिकपणे केले आहे.
दरम्यान शिर्डी, सोलापूर लोकसभा मतदार संघ रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांना सोडाव्यात. अन्यथा भाजपा महायुतीला मोठी किंमत मोजावी लागेल, असे पत्रकारांशी वार्तालाप करताना रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी सांगितले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.