पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांची गैरसोय होणार नाही याचे सूक्ष्म नियोजन करावे – ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील बरड, फलटण, लोणंद, नीरा, दत्त घाट येथे मंत्रिमहोदय यांचा पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत दौरा…
फलटण (बारामती झटका)
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्ह्यातील बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, निरा, दत्त घाट पालखी तळांची पहाणी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे भाऊ यांनी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
या पाहणी प्रसंगी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर (बाळराजे), आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपायुक्त तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
सध्या पालखी मार्गावर पाऊस पडत आहे, या पावसापासून वारकऱ्यांचा बचाव व्हावा, यासाठी दहा हजार क्षमतेचे वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी अशा सूचना दिल्या.
ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावीत, त्याचबरोबर जी कामे पूर्ण होणार नाहीत त्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात.

पालखी सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने पालखी मार्गावर, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.