आता फक्त इतक्या रुपयांच्या पासमध्ये वर्षभर ‘फ्री’ प्रवास, मंत्री नितीनजी गडकरींचा मास्टरस्ट्रोक

मुंबई (बारामती झटका) लोकमत साभार
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी आज (बुधवारी) एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे लाखो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता सरकार ३,००० रुपयांचा फास्टॅग-आधारित वार्षिक पास सुरू करणार आहे. हा पास १५ ऑगस्टपासून उपलब्ध होईल आणि तो फक्त गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी असेल.
कसा असेल हा नवीन पास ?
हा नवीन वार्षिक पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० फेऱ्यांसाठी (यापैकी जे आधी पूर्ण होईल) वैध असेल. याचा अर्थ, तुम्ही देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून वर्षभर किंवा २०० फेऱ्या पूर्ण होईपर्यंत कोणताही अतिरिक्त टोल न भरता प्रवास करू शकाल.
मंत्री नितीनजी गडकरी म्हणाले की, या पासमुळे नागरिकांना देशभरात सहज आणि कमी खर्चात प्रवास करणे शक्य होईल. विशेषत: ६० किमीच्या आत असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी या पासमुळे दूर होतील. यामुळे टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही, गर्दी कमी होईल आणि टोल नाक्यांवरील वादही टळतील. लाखो खाजगी वाहन मालकांना यामुळे जलद आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल, असे सरकारचे उद्दिष्ट आहे.
कसा मिळेल हा पास ?
या नवीन वार्षिक पासला सक्रिय करण्यासाठी आणि त्याचे नूतनीकरण करण्यासाठी लवकरच राजमार्ग यात्रा अॅप तसेच NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग संघटना) आणि MORTH (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय) च्या अधिकृत वेबसाइटवर एक खास लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
मागील चर्चा आणि भविष्यातील योजना
गेल्या महिन्यात अशी चर्चा होती की, सरकार एका नवीन टोल धोरणावर काम करत आहे. त्यावेळी ३,००० रुपयांच्या वार्षिक पाससोबतच प्रत्येक १०० किलोमीटरसाठी ५० रुपये असा फ्लॅट टोल घेण्याचा पर्यायही विचाराधीन होता. मात्र, गडकरींनी सध्या फक्त वार्षिक पासची घोषणा केली आहे. यापूर्वी, सरकारने ३०,००० रुपये किंमतीचा ‘लाइफटाइम फास्टॅग’ (जो फक्त १५ वर्षांसाठी वैध होता) हा प्रस्ताव मागे घेतला होता.
भविष्यात, ही नवीन प्रणाली सध्याच्या FASTag च्या सोयीचा वापर करेल. परंतु, हळूहळू टोल बूथची जागा सेन्सर-आधारित संकलन प्रणाली घेईल. ही प्रणाली जीपीएस (GPS) आणि वाहनांचा आपोआप मागोवा घेऊन टोल जमा करेल, ज्यामुळे रस्त्यावर कुठेही न थांबता प्रवास करता येईल. यामुळे प्रवासाचा अनुभव आणखी चांगला होईल, अशी अपेक्षा आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



