सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्निप्रदिपनाचे, सुदर्शन होमाचे मेघराजासहीत पावसाच्या सरींनी केले स्वागत…

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
सद्गुरु श्री श्री रविशंकरजी तथा गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने “सेवा निसर्गाची, उन्नती आपली” या ध्येयाने प्रेरित होऊन गेली बारा वर्ष सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या व सर्व घटकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि. श्रीनगर, राजेवाडी, ता. आटपाडी, या कारखान्याचा १२ वा ऊस गळीत हंगाम सन २०२३-२४ चा बॉयलर अग्निप्रदिपन व सुदर्शन होमाचे चेअरमन एन. शेषागिरीराव यांचे शुभ हस्ते व व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, व्यवस्थापकीय संचालक उदय जाधव, संचालक मोहन बागल, उषाताई मारकड, जनरल मॅनेजर रामराव रेड्डी यांचे प्रमुख उपस्थितीत शास्त्री कापरे गुरुजी यांच्या धार्मिक व विधियुक्त पूजेने व मंत्र पठणाने उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कांतीलाल नाईक नवरे, बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते कृष्णा पुजारी, गादेगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बागल, राजेवाडीचे सरपंच कैलास शिरकांडे, पिलीव भागातील कृष्णा डेअरीचे चेअरमन श्यामतात्या मदने, पिलीव सोसायटीचे संचालक कृष्णांत मदने पाटील, हिंगणीचे सरपंच, इटकीचे सरपंच कृष्णा सावंत, बचेरीच्या सरपंच राणी गोरड, फळवणीचे तंटामुक्ती अध्यक्ष ज्योतीराम अवताडे, माळशिरस, पंढरपुर, आटपाडी, माण, सांगोला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, अनेक संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व ऊस उत्पादक सभासद व सर्व घटकातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कारखान्याच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक उदय जाधव यांनी सर्व ऊस उत्पादकांना दिपवाळी गोड होईल, असा कारखान्याकडून निश्चितच निर्णय घेतला जाईल. व चालू हंगामात देखील ऊस उत्पादकांचे संतोषजनक समाधान होईल, अशा प्रकारचे दराच्या बाबतीत बोलून दाखवले. तर आभार समारंभाच्या माध्यमातून व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी ऊस उत्पादकांचे व शेतकऱ्यांचे समाधान हेच आमचे समाधान समजून कारखाना भविष्यकाळात सुद्धा आपले हित जोपासणार असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी सर्व खाते प्रमुख, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन एच. आर. अँड ॲडमिन मॅनेजर सचिन खटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. तर प्रास्ताविक केनमॅनेजर सुनिल सावंत यांनी केले. सदर कार्यक्रमावेळी मेघगर्जनेसह पावसांच्या सरींनी एकप्रकारे स्वागतच केल्याचे बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng