शिवसेनेला विश्वासात घेऊनच काम करणार – पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर

करमाळा (बारामती झटका)
करमाळा तालुक्यात शिवसेनेचा निर्णायक मतदार वर्ग असून शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माझा मनापासून प्रचार केला आहे. याची जाणीव मला असून येणाऱ्या काळात शिवसैनिकांना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच काम करू, असा विश्वास पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
करमाळा तालुक्यातील निधी वाटप करताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांना निधी दिला व त्यांनाच झुकते माप दिले, अशी तक्रार शिवसैनिकांची होती.
यावर आज करमाळा दौऱ्यावर असताना खासदार निंबाळकर यांनी मित्र पक्षांची चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे आरपीआय जिल्हाप्रमुख रमेश कांबळे, युवा सेना जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, उप शहरप्रमुख नागेश गुरव, जेष्ठ पत्रकार नासिर कबीर, कोळेगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. नाईक निंबाळकर यांनी स्वतंत्र शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शिवसैनिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. करमाळा तालुक्यात शिवसेनेचे २५,००० मतदान असून याचा प्रत्यय आतापर्यंतच्या निवडणुकीत आला असून शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय कोणीही आमदार होऊ शकत नाही किंवा खासदारला मताधिक्य मिळू शकत नाही. असा दावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करून भाजपच्या प्रमाणातच शिवसेनेला निधी देण्याची मागणी केली.
संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासोबत लवकरच शिवसेनेच्या माढा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्राध्यापक सावंत सांगतील त्या पद्धतीने आगामी काळात काम करू, असा विश्वास व्यक्त केला.
तालुक्यातील रिक्त असलेली तहसीलदार, मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिकारी यांची पदे लवकरच भरू, तशी शिफारस मुख्यमंत्र्याकडे करू असे आश्वासन दिले.
नियोजन मंडळातील खासदारच्या वाट्याचा १० टक्के निधी यावर्षी पूर्णपणे शिवसेनेला देऊ, असा शब्द शिवसेना पदाधिकाऱ्यांना खा. नाईक निंबाळकर यांनी दिला.
पुढील काळात करमाळ्यात येताना प्रत्येक वेळेस शिवसेनेला निरोप देण्याची काळजी आमचे सचिव किंवा पीए घेतील. शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोडून कोणताही कार्यक्रम करमाळा घेणार नाही, असेही यावेळी नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील रेल्वे व इतर प्रश्न संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला लवकरच घेऊन जाऊ, असे शेवटी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng